अंबरनाथकरांना मेट्रोचे गिफ्ट ! -चिखलोली येथे होणार रेल्वे मेट्रो इंटिग्रेशन कल्याण बदलापूर रस्त्याला धावणार मेट्रो खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या एमएमआरडीएला विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना ।

  • अंबरनाथकरांना मेट्रोचे गिफ्ट !
  • चिखलोली येथे होणार रेल्वे मेट्रो इंटिग्रेशन
  • कल्याण बदलापूर रस्त्याला धावणार मेट्रो
  • खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या एमएमआरडीएला विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना ।

प्रमोद कुमार

डोंबिवली : ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ प्रकल्प विस्तार करून आता दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मार्गाने थेट अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत पोहचणार आहे. यामुळे अंबरनाथ, उल्हासनगर आणि आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांना मेट्रोचा थेट लाभ मिळणार असून, चिखलोली हे स्थानक एक प्रमुख ट्रान्सपोर्ट हब म्हणून उदयास येणार आहे. बदलापूर – कांजूरमार्ग मेट्रो १४ च्या माध्यमातून अंबरनाथ,बदलापूर आणि आसपासच्या नागरिकांना थेट मुंबई गाठता येणार आहे. तर मेट्रो ५च्या या विस्तारामुळे नागरिकांना ठाणे गाठणे सोपे होणार आहे.
विशेष म्हणजे, चिखलोली रेल्वे स्थानकाच्या येथे रेल्वे आणि मेट्रोचे एकत्रीकरण होणार असल्यामुळे प्रवास सुलभ व सुसंगत होईल. यासाठी स्थानकाची तशा पद्धतीने उभारणी करण्यात येणार असून याबाबतचा सविस्तर विकास आराखडा एमएमआरडीएला तयार करण्याच्या सूचना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. एमएमआरडीएच्या मुख्यालयात याबाबत शुक्रवारी बैठक पार पडली. यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी या सूचना केल्या आहेत. याबाबत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांनी याबाबत मागणी देखील केली होती.
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मतदारसंघात वाहतुकीला नवा आयाम देणारे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. रस्ते, मेट्रो, उड्डाणपूल यांची सुसज्जता ठेवण्यास खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे विशेष प्रयत्न आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यासह कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या वाहतूक वेगवान होण्याच्या दृष्टीने मेट्रो ५ चा विस्तार आता या भागातील विकासाचे नवे दालन उघडणारे ठरणार आहेत. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो ५ हा प्रकल्प आता दुर्गाडी नाका ते कल्याणमार्गे उल्हासनगरच्या कल्याण बदलापूर मार्गाने थेट अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान उभे राहत असलेल्या चिखलोली रेल्वे स्थानकापर्यंत पोहचणार आहे. या मार्गावर बिर्ला कॉलेज, शहाड, आणि उल्हासनगर यांसारख्या महत्त्वाच्या भागांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील हजारो नागरिकांना थेट दारात मेट्रोची दारात सेवा मिळणार आहे. तर कल्याण-बदलापूर रस्त्यावरून मेट्रो धावल्याने वाहतूक कोंडीत मोठा दिलासा मिळेल. नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचेल, लोकल ट्रेनवरील ताण कमी होईल, आणि पर्यावरणपूरक पर्यायामुळे प्रदूषणावरही नियंत्रण मिळेल. शिवाय, या मेट्रो स्थानकांच्या आजूबाजूला वाणिज्य, सेवा उद्योग आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण होतील. एकूणच या मेट्रो प्रकल्पांचा उद्देश फक्त वाहतूक सुधारणा नव्हे, तर एकत्रित नागरी विकास साधण्याचा आहे.
सध्या या मेट्रो प्रकल्पाचे विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत असून, लवकरच यासाठी निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे. हा मेट्रो प्रकल्प म्हणजे कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड आणि चिखलोली या भागांच्या विकासाचा रोडमॅप ठरणार असून, ‘एक शहर एक मेट्रो नेटवर्क’ या संकल्पनेची सुरुवात यामुळे प्रत्यक्षात होणार आहे. याबाबतचा सविस्तर विकास आराखडा एमएमआरडीएला तयार करण्याच्या सूचना कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. एमएमआरडीएच्या मुख्यालयात याबाबत शुक्रवारी बैठक पार पडली. यावेळी खासदार डॉ.शिंदे यांनी या सूचना केल्या आहेत.
यावेळी बैठकीला आमदार डॉ.बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, रवी पाटील, राजेश कदम यांच्यासह एमआरडीए आयुक्त डॉ.संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त विक्रम कुमार, अश्विन मुदगल यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

चिखलोली ठरणार ट्रान्सपोर्ट हब
मेट्रो 5 चा विस्तार चिखली रेल्वे स्थानकापर्यंत केल्याने नागरिकांना एकाच ठिकाणाहून मेट्रो आणि रेल्वे या दोन्ही वाहतूक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे लवकरच चिखलोली रेल्वे स्थानक हे महत्वाचे ट्रान्सपोर्ट हब होणार आहे.

बदलापूर आणि अंबरनाथ शहरातून मुंबई आणि ठाणे येथे प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. यामुळे या दोन्ही स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दीचा ताण येतो. हा ताण कमी करण्यासाठी दोन्ही शहराच्या मध्यभागी चिखलोली रेल्वे स्थानकाची उभारणी करण्यात येत आहे. या दरम्यान आता मेट्रोची देखील चिखलोली रेल्वे स्थानकातून द्विस्तरीय वाहतूक झाल्याने गर्दीचा ताण अधिक कमी होणार आहे. याच हेतून येथून मेट्रो चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

– डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार, कल्याण लोकसभा